पुनाळ (कोल्हापूर) : मानेवाडी-भाचरवाडी (ता. पन्हाळा) येथील तळीमाळ नावाच्या गायरान जमिनीवर संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदविका (डिप्लोमा) व पदवी (डिग्री) विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. या वेळी तेथील गणपती मंदिर परिसरात कोतोली, वाघवे, आसुर्ले-पोर्ले, माजगाव, पडळ, सांगरूळ, भामटे, कळे, वाघुर्डे, घरपण, तिसिंगी, साळवन, घोटवडे व नांदगाव या भागात वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत त्यात आपला थोडासा तरी सहभाग असावा म्हणून आणि अतुल नाईक व उमेश कुंभार या विद्यार्थ्यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अभ्यास करण्याची जागा स्वच्छ आणि सुंदर असेल, तर नक्कीच अभ्यास चांगल्या प्रकारे होतो. त्यामुळे सभोवतालचा परिसर निसर्गरम्य हवा. यासाठी पर्यावरणपूरक झाडे लावणे आवश्यक आहे.
वृक्षारोपणासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः श्रमदानातून खड्डे खोदले. ‘आव्हान नवे पेलू चला, हिरवे रान फुलवू चला!’ अशा अनेक घोषणा विद्यार्थ्यांनी या वेळी दिल्या. वेगवेगळ्या जातीच्या एकूण २५ झाडांची या वेळी लागवड करण्यात आली.
लावलेली झाडे जगवण्याची व त्यांची देखरेख करण्याची शपथही विद्यार्थ्यांनी घेतली. ‘संजीवन’मधील शिक्षक संग्राम पाटील, नीलेश मेडसिंग, अजिंक्य पाटील, संभाजी पाटील, विजय उदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. त्यांना राजेंद्र पाटील, संदीप सुतार, रतन कुंभार व सागर पाटील यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला प्रमोद घारगे, विशाल चौगले, श्रीधर नाईक, शिवप्रसाद पाटील, ओंकार पाटील, अभिजित रामाने, संदीप पाटील, प्रमोद शिखरे, प्रज्ञा पाटील, शिल्पा बोडके, शिवानी बोरगे, ज्ञानेश्वरी पाटील, स्नेहल पाटील, सोनल पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
संजीवन कॉलेजचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. मुळगुंद, संजीवन संस्थेचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांचे या कार्यक्रमास विशेष सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन लाभले.